मुख्यमंत्री फडणवीस- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कुरघोडी? उदय सामंत यांनी दिले थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:06 IST2026-04-29T18:58:53+5:302026-04-29T19:06:22+5:30
तलावांच्या कामांवरील स्थगितीवरही मांडली उदय सामंत यांनी भूमिका

मुख्यमंत्री फडणवीस- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कुरघोडी? उदय सामंत यांनी दिले थेट उत्तर
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कुठल्याही मुद्यांवरून कुरघोडीचे राजकारण सध्या नाही. दोघांमध्ये सामंजस्याचा संवाद आहे. दोघांमध्ये अतिशय चांगले बॉण्डिंग असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात कौशल्य विकास केंद्राचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आले होते. तत्पूर्वी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारच्या १४ तलाव संरक्षण प्रकल्पांतर्गत घेतलेले निर्णय रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे यांनी मंजूर केलेल्या ११ प्रकल्पांचा समावेश होता. त्यासाठी वितरित केलेले ७३ कोटी परत मागण्यात आले आहेत. अशी चर्चा सुरु आहे. यावर सामंत म्हणाले, सरकारमध्ये येऊन एक वर्ष सात महिने झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीही कुरघोडी नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे तलावांबाबतचा निर्णय झाला असावा. मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर मंत्री सामंत म्हणाले, आत्महत्यांचे प्रमाण थांबले पाहिजे. त्या होऊच नये हीच सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये.
कडूंना भेटणार नाही....
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मंत्री सामंत यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर सामंत म्हणाले, कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. आम्हाला एकमेकांना भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी त्यांना भेटलेलो नाही आणि भेटणारही नाही. खा. संजय राऊत यांनी दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषद उमेदवारीबाबत विचारले असता, ‘मी त्यावर बोलणार नाही’, असे सामंत म्हणाले. माजी खा. इम्तियाज जलील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारकडे द्यावेत. पोलिस महानिरीक्षकांनी त्यांच्याकडील पुरावे घेण्यासाठी चौकशीसाठी बोलवावे, असेही सामंत म्हणाले.