ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी!

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 13, 2023 05:29 PM2023-07-13T17:29:54+5:302023-07-13T17:30:18+5:30

मेथी, शेपू, पालक भाज्या खाऊन ‘वीट’ आला; मग खा ‘रानभाज्या ’

No fertilizer, no spraying; Eat wild vegetables in rainy season, you will be healthy! | ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी!

ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वर्षभर मेथी, शेपू, पालक, करडी या पालेभाज्या खाऊन तुम्हाला ‘वीट’ आला आहे? जिभेला तोडी वेगळी चव पाहिजे? मग, विचार कसला करता? पावसाच्या आगमनासोबत भाजीमंडईत ‘रानभाज्या’ विक्रीला येऊ लागल्या आहेत. शहरवासीयांना ‘रानभाज्यां’चे औषधी गुणधर्म कळाल्याने, मिळेल त्या भावात ‘रानभाज्या’ खरेदीची तयारी त्यांनी ठेवली आहे. यामुळे ‘करटुले’ चक्क ३०० रुपये किलोने विकले जात आहे.

कुठून येतात रानभाज्या?
पावसाळा सुरू झाला की, रानभाज्या उगवायला सुरुवात होते. विशेष म्हणजे अलीकडील काळात जिल्ह्यातील २५ ते ३० शेतकरी रानभाज्यांची शेती करीत आहेत. या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने उगवल्या जातात. लागवड न करता या भाज्या येतात. त्यांना बियाणे लागत नाही, रासायनिक खताचा वापर केला जात नाही. कीटकनाशक वापरले जात नाही. डोंगरदऱ्यांत, शेताच्या बांधावर, माळरानात त्या येतात.

तब्बल ९३ प्रकारच्या रानभाज्या
महाराष्ट्रात ९३ प्रकारच्या रानभाज्या आढळतात. त्यातील मोजक्याच भाज्या तुरळक प्रमाणात बाजारात विक्रीला येतात. करटुले, तांदूळजा, रान तोंडोळी, भुई पालक, रानशेपू, कुर्डू, माटला, करटोली, घोळ, आंबुशीकुुर्डू, केना, सुरण, दिंडा, फांदा, पाथ्री, भुईआवळील, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उबर, चिमुर, सराटे, मयाळू तेर आळू, रान माठ, हरभऱ्याची कोवळी पाने आदी भाज्यांचा त्यात समावेश असतो.

रानभाज्या महोत्सवामुळे शहरात जनजागृती
कृषी विभागाच्या वतीने मागील काही वर्षांपासून नियमितपणे जुलै-ऑगस्ट दरम्यान ‘रानभाज्या महोत्सव’ भरविला जात आहे. त्यात जिल्ह्यातील २५ ते ३० शेतकरी त्यांच्या भागातील रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येतात. महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाने ‘रानभाज्यां’चे महत्त्व नागरिकांना पटवून दिल्याने रानभाज्या खरेदी करणारा एक ग्राहकवर्ग शहरात तयार झाला आहे.

१) देशात १४५ कंद, ५२९ हिरव्या भाज्या तर १०१ फुलभाज्यांचे प्रकार आहेत.
२) देशात ६४७ प्रकारच्या फळभाज्या आहेत.
३) महाराष्ट्रातील मुख्य आदिवासी जमाती २५ प्रकारच्या रानभाज्यांचा उपयोग करतात.
४) आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक, त्रिदोषहारक असे रानभाज्यांचे फायदे आहेत.
५) १४ वनस्पतींचा मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवर औषधी म्हणून वापर होतो.
६) काही रानभाज्या गर्भवती आणि बालकांसाठी उपयुक्त मानल्या जातात.
७) शहरातील भाजीमंडईत बोटावर मोजण्याइतक्याच रानभाज्या विक्रीला येतात.
८) श्रावणात रानभाज्यांची आवक वाढते.

Web Title: No fertilizer, no spraying; Eat wild vegetables in rainy season, you will be healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.