तो क्षण आनंद आणि अभिमानाचा
By Admin | Updated: August 15, 2014 01:13 IST2014-08-15T00:54:50+5:302014-08-15T01:13:57+5:30
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वाजारोहण केल्यानंतरचा क्षण आनंद देणारा आणि अभिमान वाटावा असा असतो, असे मत शिपाई रामदास मालकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

तो क्षण आनंद आणि अभिमानाचा
अशोक कारके
औरंगाबाद : ज्या राष्ट्रध्वाजाला सर्व नागरिक मानवंदना देतात. त्या ध्वाजारोहणात आपला काही सहभाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. ध्वज बांधणे आणि उतरविणे हे जबाबदारीचे काम आहे. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वाजारोहण केल्यानंतरचा क्षण आनंद देणारा आणि अभिमान वाटावा असा असतो, असे मत शिपाई रामदास मालकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
वीस वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर सौनिक सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेत नोकरी करताना पुन्हा देश सेवा करण्याची संधी ध्वज बांधताना आणि उतरवताना मिळत आहे. यापूर्वी सैन्यदलातही त्यांच्यावर ध्वज बांधण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी होती. हे काम करताना जबाबदारी आणि दक्षता पाळावी लागते. ध्वज बांधताना सकाळी नियोजित वेळेच्या आत आणि केसरी रंग वरच्या बाजूने येईल, अशा पद्धतीने बांधावा लागतो. त्यामध्ये ध्वाजारोहणप्रसंगी विविध रंगांच्या फुलांचा वर्षाव होईल, अशा पद्धतीने फुले बांधावी लागतात. त्याचबरोबर एका विशिष्ट पद्धतीने ध्वज बांधावा लागतो.
अगदी सहज गाठ सुटेल, अशी दक्षता पाळवी लागते. त्यानंतर ही मान्यवरांच्या हस्ते ध्वाजारोहण व्यवस्थित होईल का? याचे मनात दडपण असते. यामुळे ध्वाजारोहणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी पूर्ण भान हरवून जातो. ही एक युद्धात उतरल्यासारखी मोठी जाबाबदारी आहे; पण हे अभिमानस्पद काम करण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. ते काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान मानतो आणि अभिमान बाळगतो, असे मत मालकर यांनी व्यक्त केले.