वेरूळ लेणीत मधमाशांचे तांडव! शेकडो पर्यटकांची धावपळ; ८ गंभीर जखमी, प्रशासकीय ढिसाळपणा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:15 IST2026-05-04T12:13:54+5:302026-05-04T12:15:01+5:30
वनविभाग की पुरातत्त्व विभाग? वेरूळ लेणीतील मधमाशांचे पोळे काढण्याच्या जबाबदारीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी.

वेरूळ लेणीत मधमाशांचे तांडव! शेकडो पर्यटकांची धावपळ; ८ गंभीर जखमी, प्रशासकीय ढिसाळपणा उघड
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील कैलास लेणी (क्र. १६) आणि लेणी क्र. १० मध्ये रविवारी सकाळी १०:३० च्या सुमारास मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ८ पर्यटक गंभीर जखमी झाले असून ५० ते १०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पर्यटकांची मोठी तारांबळ
सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणीत पर्यटकांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लहान मुले आणि वृद्ध पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. कोल्हापूर येथील पर्यटक राकेश देसाई यांनी तक्रार नोंदवली की, जीव वाचवून पळणाऱ्या पर्यटकांना मदत करण्याऐवजी प्रवेशद्वारावर टोकन मागून अडवणूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी नेण्याची कोणतीही सोय पुरातत्त्व विभागाने केली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे.
जागतिक वारसा स्थळ वेरूळ हादरले! पर्यटकांवर मधमाशांचा भीषण हल्ला; ८ पर्यटक गंभीर जखमी #ElloraCaves#chhatrapatisambhajinagar#marathwadapic.twitter.com/tRyrh8wWbz
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 4, 2026
दोष कुणाचा? अधिकाऱ्यांमध्ये जुंपली
नागपूरचे पर्यटक सतीश देवजवार यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर मधमाशांचे पोळे काढण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, यावरून वाद सुरू झाला आहे. पुरातत्त्व विभागाने वनविभागाकडे बोट दाखवले आहे, तर वनविभागाने ही जबाबदारी पुरातत्त्व विभागाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे.