ा : तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ चालू वर्षात तर तब्बल ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ पेरणीसाठी झालेला महिनाभराचा विलंब आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्णत: सोयाबीनवर खिळल्या होत्या़ पण सोयाबीनने शेतकऱ्यांना अडचणीतच टाकले आहे़ सोयाबीनचा एकरी उतारा निम्म्यावर आला आहे तर भावातही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल पंधरा ते सोळा कोटी रूपयांचा फटका बसला असल्याचे पहावयास मिळते़औसा तालुक्यातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ यावर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी महिनाभर उशिराने पाऊस झाला़ पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा केला़ ९८ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या़ यामध्ये ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले़ पेरणीसाठी बियाणे, खते, मजुरी असा जवळपास ४ कोटी रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केला़ त्यानंतर खुरपणी, फवारणी, काढणी आणि राशी करणे यावरही जवळपास ७ ते ८ कोटींचा खर्च आहे़ पेरण्या झाल्यानंतर पावसाने दिलेली ओढ आणि सोयाबीन ऐन बहरात असताना गायब झालेला पाऊस यामुळे उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली़ तसेच चार ते साडेचार हजार रूपये क्विंटलला भाव होता़ पण शेतकऱ्यांकडे माल आल्यास प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रूपयांचा भाव मिळत आहे़एकरी ८ ते १० क्विंटलचा उतार आता ३ ते ६ क्विंटलवर गेला आहे़ त्यातच भाव खालावल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे़ बियाणे, खते, मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ पण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मात्र घसरणीला लागले आहेत़ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन पिकाचा १५ कोटींचा फटका बसल्याने तो उद्धवस्त झाला आहे़ उटी बु़ येथील सरपंच व प्रगतशील शेतकरी अॅड़ भालचंद्र पाटील म्हणाले, यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर ६० ते ७० हजार रूपये खर्च केले होते़ उत्पन्न मात्र १ लाखाचे झाले आहे़ आता वर्षभराचा खर्च, सालगड्याच्या पगारी कशा करायच्या हा प्रश्न आहे़ आता रबीसाठी पाऊस नाही झाला तर शेती कसायची कशी, असा प्रश्न पडला आहे़ (वार्ताहर)
शेतकऱ्यांना पंधरा कोटींचा फटकाऔस
By admin | Published: October 25, 2014 11:41 PM