लग्नसमारंभासाठी आचारसंहिता जाहीर

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-17T23:37:26+5:302014-12-18T00:40:54+5:30

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये,

The Code of Conduct for the wedding ceremony | लग्नसमारंभासाठी आचारसंहिता जाहीर

लग्नसमारंभासाठी आचारसंहिता जाहीर

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये, असा निर्णय राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतने घेतला आहे. १ जानेवारी २०१५ पासून ही आचारसंहिता समाजात लागू होणार आहे.
खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी यांच्या उपस्थितीत समाजाची एक बैठक घेण्यात आली. यानंतर लग्नसमारंभाची आचारसंहिता जाहीर करण्यात आली. १ जानेवारी २०१५ पासून आचारसंहितेचे पालन व्हावे, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. विवाहपत्रिकेनुसार निर्देशित वेळेवरच विवाह लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुहूर्तापासून ३० मिनिटांच्या आत लग्न लावण्यात आले नाही, तर सर्व सदस्य हात जोडून निघून जातील. जेवणात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत. लग्नसमारंभात संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, मंगलाष्टकांनासुरुवात झाल्यापासून वधू-वर एकमेकांना हार घालेपर्यंत मध्येच ते थांबवून स्वागत- सत्कार करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये इ. अटींचा समावेश करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास समाजबांधव त्या लग्नसोहळ्यात जेवण न करता निघून जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी समितीचे मुख्य संयोजक महावीर पाटणी, विनोद लोहाडे, अशोक अजमेरा, दिलीप कासलीवाल, प्रकाश अजमेरा, दिलीप ठोळे, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, एम.आर. बडजाते, डॉ. प्रकाश पापडीवाल यांच्यासह विश्वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The Code of Conduct for the wedding ceremony