छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप, वंचितकडून एमआयएमची घेराबंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:56 IST2026-04-21T19:55:43+5:302026-04-21T19:56:00+5:30
व्हायरल व्हिडिओवरून महापौरांनी दिली एमआयएम पक्षाचे विरोधी पक्षनेत्याला समज

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप, वंचितकडून एमआयएमची घेराबंदी!
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील एमआयएम पक्षाचे विरोधी पक्षनेता अब्दुल समीर यांनी काही दिवसांपूर्वी कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराला ‘यापुढे कोणत्याही कामाबाबत महापौर, आमदार कोणालाही विचारायची गरज नाही. इम्तियाज जलील ठरवतील तेच होईल’, असे सांगितले होते. याचे पडसाद सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभेतही उमटले. भाजप व अन्य नगरसेवकांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे एमआयएम पक्षाची चारही बाजूंनी कोंडी झाली. शेवटी महापौर समीर राजूरकर यांनी विरोधी पक्षनेत्यांना समज देऊन विषयाला पूर्णविराम दिला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी सुरू झाली. पार्श्वगायिका आशा भोसले, मनपातील कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांचे वडील डी.एस. गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी अब्दुल समीर यांच्या व्हिडिओचा मुद्दा उपस्थित केला. स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौरांचा अपमान सहन केला जाणार नाही, दादागिरी चालणार नाही, असे म्हणत कारवाईची मागणी केली. वंचितचे अफसर खान यांनी एका असंसदीय शब्दाचा वापर केला. त्यामुळे एमआयएम नगरसेवकांना चांगलेच झोंबले. त्यांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी राजगौरव वानखेडे यांनी तर सदस्यत्व रद्द करण्याची मागणी प्रमोद राठोड यांनी केली.
लोकप्रतिनिधींचा अपमान करणे, ही चांगली बाब नाही. मंत्री, खासदार, आमदार यांच्याविषयी बोलताना भान ठेवा. यापुढे असे होणार नाही, याची काळजी घेण्याची समज महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चालतो, याचीही आठवण उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी करून दिली. यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घ्या, अशी सूचनाही मांडली. त्यावर उसामा अब्दुल कदीर, अब्दुल समीर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी त्याची आम्हाला गरज नाही, असे उत्तर दिले.
‘संभाजी पेठ’वरून राजकारण
औरंगपुरा हे नाव बदलून संभाजी पेठ असे नामकरण करावे, असा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी मांडला. उद्धवसेनेचे रशीद मामू यांनी संभाजी महाराजांचे नाव एका वसाहतीला देण्यापेक्षा मोठ्या शहराला द्या, अशी भूमिका मांडली. त्यावर भाजपा नगरसेवकांनी कडाडून विरोध सुरू केला. गटनेत्यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी प्रमोद राठोड यांनी केली. पक्षाची भूमिका त्यांच्या अंगवळणी पडायची आहे, असा टोला राजू वैद्य यांनी लावला. सचिन खैरे यांनी या भागाला संभाजी पेठ असे नामकरण करण्यास पाठिंबा दिला. महापौर राजूरकर यांनी प्रस्ताव मंजूर केला.