परिमल डोहणे -चंद्रपूर : ग्रामविकास विभागाच्या स्मार्ट ग्राम योजनेमुळे अनेक गावांना प्रोत्साहन मिळाले. आता या योजनेचे नामकरण ‘सुंदर गाव’ असे झाले असून, पुरस्कारातही शासनाने लाखोंची वाढ केली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सहभागी ग्रामपंचायतींत विकासकामांची चुरस रंगणार आहेत.स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्कार देण्यात येत होते. आता सुंदर गाव स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ५० लाख असा एकूण ७० लाखांचा पुरस्कार देण्यात येईल.गावात होणार ही कामे -अपारंपरिक ऊर्जा व संबंधित अभिनव उपक्रम, स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, महिला सक्षमीकरण व मुलांना अनुकूल प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली, आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्त्वे, संकलन आणि तपासणी सूची तयार करून दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प, सौर पथदिवे, वाय-फाय सिस्टीम, आदी बाबींवर या पुरस्कार निधीतून गावात कामे केली जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने पुरस्काराच्या रकमेत लाखोंची वाढ केल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळणार आहे.
‘स्मार्ट’ऐवजी आता ‘सुंदर’ होणार गाव ! ग्रामपंचायतीला ७० लाखांचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 4:23 AM