गावालगतच्या शेतात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:23+5:302021-01-18T04:26:23+5:30
फोटो घुग्घूस : नजीकच्या शांतीनगर वॉर्ड क्रमांक ६ येथील पती-पत्नी शनिवारी रात्री घरून गेले. मात्र त्या दोघांचाही मृतदेह ...
फोटो
घुग्घूस : नजीकच्या शांतीनगर वॉर्ड क्रमांक ६ येथील पती-पत्नी शनिवारी रात्री घरून गेले. मात्र त्या दोघांचाही मृतदेह शेजारच्या शेतात एकमेकाजवळ मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संदेश रामस्वामी तकल्ला (२८) व उमेश्वरी संदेश तकल्ला( २४) असे मृतक पती-पत्नीचे नाव आहे. सदर घटनेसंदर्भात घुग्घुस पोलिसांनी मार्ग दाखल केला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दोघे पती-पत्नी घरून निघून गेले. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह नजीकच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळाकडे लोकांनी घाव घेतली. सदर घटनेची माहिती ठाणेदार राहुल गांगुर्डे यांना मिळताच पोलीस कर्मचाऱ्यासोबत घटनास्थळी पोहोचले. मात्र मृतकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा निर्णय नागरिकांनी घेतला. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ दंगा नियंत्रण पथकाला बोलाविले.
शेतात वीजप्रवाहित ताराला स्पर्श झाल्यामुळे ही घटना घडली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, राजकीय मंडळी व शेतकरी सोनबा बांदूरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. मृतकांना एक पाच व एक तीन वर्ष वयांची मुले आहेत. दोन्हीही मुलाच्या नावाने बॅँकेत मुदतठेव ठेवण्याचा समझोता झाला असल्याचे कळते.