कोरोनाचा कहर सुरू असतानाही सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून जीवनावश्यक दुकानांसह बहुतांश दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवागनी दिली. १ ते ३१ जुलैपर्यंत कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. मात्र, प्रशासनाने सातत्याने सूचना देवूनही नागरिकांकडून जमावबंदी धाब्यावर ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. सहा फुटाचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यातही नागरिक कुचराई करीत असल्याने कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जुलै महिन्यात दररोज सुमारे १५ ते १८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद आहे. कोरोनाचा कहर असा सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते, ही शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना सुरू केल्या. वेगवगळ्या माध्यमांतून जागृती सुरू असूनही नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.
दुकानांसमोरील सॅनिटायझर हटविले
दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने आर्थिक व्यवहार हळूहळू रूळावर येत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाही जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास एक तासांचा जादा कालावधी देण्यात आला. ग्राहक दुकानात आल्यास आधी हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. लॉकडाऊन काळात बहुतांश दुकानदारांनी या सूचनांचे पालन केले होते. मात्र, आता बºयाच व्यावसायिकांनी स्वत:च्या दुकानासमोर सॅनिटायझर बॉटल हटविल्याचे दिसून येत आहे.
फक्त मास्क न वापरणाऱ्यांविरूद्धच कारवाई
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाकडून २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१ अन्वये कारवाई सुरू आहे. मात्र,चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थळावरील मुख्य बाजारपेठ, वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतानाही प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेणे सुरू असल्याचा आरोप काही जागरूक नागरिकांनी केला आहे. रविवारी चंद्रपूर शहरातील बाजार सुरू होता. या बाजारातही प्रचंड गर्दी दिसून आली.