ते स्मारक देते हौतात्म्याची आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:47+5:30
चंद्रपुरातील हुतात्मा स्मारक शहीद जनार्दन जयराम उपगन्लावार व बाबुराव पुलेश्वर राजगोंड यांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आले आहे. जनार्दन जयराम उपगन्लावार हे मूळ भद्रावतीचे होते. त्यांचा जन्म १८८७ तर मृत्यू १९४२ मध्ये झाला.त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग घेत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर बाबुराव पुलेश्वर राजगोंड हे मूळ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेले मोरमपल्ली या गावचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इंग्रजाविरुध्दच्या स्वातंत्रलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणीची आहुती दिली. देशासाठीचे त्यांचे हे योगदान भावी पिढ्यांना सातत्याने होत स्मरत रहावे, यासाठी चंद्रपुरातील नागपूर मार्गावर हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची काही वर्षांपूर्वी अतिशय विदारक स्थिती होती. मात्र आता या स्मारकाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढे हे स्मारक हौतात्म्यांच्या आठवणींना कायम उजाळा देत राहणार आहे.
साधारणता ७० वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील सिव्हील लाईन परिसरात हे स्मारक उभारण्यात आले. प्रारंभी हे स्मारक डौलाने उभे होते. मात्र त्यानंतर काही वर्ष प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या स्मारकाची काहिशी दूरवस्था झाली होती. या स्मारकाची महत्त्व भावी पिढींना समजावे, यासाठी स्मारकाजवळच तत्कालीन नगरपालिकेने वाचनालयाची निर्मिती केली. त्यानंतर विद्यार्थी, नागरिक या ठिकाणी येऊ लागले. पुन्हा हे स्मारक वीर शहिदांची आठवण करून देत राहिले. तत्कालीन नगरपालिकेकडून देखभालही होऊ लागली.
चंद्रपुरातील हुतात्मा स्मारक शहीद जनार्दन जयराम उपगन्लावार व बाबुराव पुलेश्वर राजगोंड यांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आले आहे. जनार्दन जयराम उपगन्लावार हे मूळ भद्रावतीचे होते. त्यांचा जन्म १८८७ तर मृत्यू १९४२ मध्ये झाला.त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग घेत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर बाबुराव पुलेश्वर राजगोंड हे मूळ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेले मोरमपल्ली या गावचे होते. त्यांचाही भारताच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग होता. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी तेदेखील देशासाठी शहीद झाले.
मी शहीद स्मारक
भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...