विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे हेच खरे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:36+5:30
शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. जिल्हा परिषदेने आयोजित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेच्या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. जिल्हा परिषदेने आयोजित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेच्या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन पवार आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले, सन २०२५ पर्यंत ४० टक्के नोकऱ्या संपणार आहेत. पुढील ३० वर्षांनंतर जग कसे राहिल हे शिक्षकांनाही माहित नाही. त्यामुळे ३० वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता निर्माण होईल असे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले पाहिजे. देशातील ५० टक्के मुले निरूपयोगी होऊ नये यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. शिक्षण तज्ज्ञ निलेश घुगे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण म्हणजे काय आणि अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख १७ पैलुंबाबत मार्गदर्शन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवर शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वत: पासून सुरूवात केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होतील. शिक्षक, केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांची संवाद साधला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे तर संचालन प्रतिक्षा धोतरे यांनी केले. आयोजनासाठी लोकेश खंडारे, अर्चना मासिरकर, अरुण काकडे, फकीरा राठोड, प्रकाश भोयर, रणधीर पुद्दटवार, विजय ढोले, संदीप बुरेले, सूर्यकांत भडके आदींनी सहकार्य केले.