टमाटरचे भाव ऐकून डोळे लाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:32+5:30
किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : टमाटरचे भाव ऐकून डोळे लाल होण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपासून टमाटरचे भाव वाढतीवर आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे.
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकविला जातो. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर भाजीपाला शेतात खराब झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर मागणी वाढली. मागील १५ दिवसात फळ भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या संकटातून सावरत असलेल्या उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. प्रतवारीनुसार टमाटर कॅरेटला ८०० ते ९०० रुपयांच्या भाव मिळत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटरची आवक घटल्याने बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या टमाटरचे दर किलोमागे ८० रुपयांवर पोहचले. शुक्रवारपर्यंत घाऊक बाजारात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टमाटरचे दर रविवारी ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. कोरोनामुळे शेतकऱ्यांनी पाल्याभाज्यांना भाव मिळत नसल्याने भाजीपाल्याकडे पाठ फिरवली. बाजारात टमाटरची आवक कमी झाल्याने टमाटर भाव खात असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.
बाजारात टमाटरची आवक घटल्याने बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. लिलावात चांगल्या प्रतीच्या टमाटर क्रेटचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात टमाटरची विक्री ६० ते ८० रुपये किलोप्रमाणे भाव आहे.
- जवाहर राजपूत, विक्रेता, चंद्रपूर