लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस पडल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. पावसाने बल्लारपूर येथे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी एक शेतकरी दुचाकीसह पुरात गेल्याने मृत्यू झाला होता. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे दोन बळी झाले आहेत. संततधार सुरूच असल्याने शेकडो घरांची पडझड झाली, तर हजारो हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्याखाली आली. गत २४ तासांत १५ पैकी ९ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९०४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तक्रारीनंतर सर्वेक्षणासाठी बैठका- संततधार पावसाचा सर्वाधिक फटका नऊ तालुक्यांना बसला. नाल्याच्या काठावर असलेली शेती पुराच्या पाण्याखाली बुडून आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी तालुकास्तरावर तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. पुराचे पाणी उतरताच शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्गअतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, लभानसराड १०.१६३, डोंगरगाव १२७ व लाल नाला धरणातून ६३. ३४ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव, अमलनाला, पकड्डीगुडम व इरई धरणातील जलसाठ्यातही वाढ झाल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे यांनी दिली.