जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, काही ठिकाणी गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:44+5:30
राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी मध्यरात्री चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह हा पाऊस सुमारे पाऊणतास झोडपला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. घरावरी टिना उडाल्या. विजेचे खांब कोसळले. परिणाम चंद्रपूरसह अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला.
राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चिंचोली, वरोडा परिसरासह राजुरा तालुक्यातील बहुतांश गावात आलेल्या अवकाळी पावसासह वादळाने मोठे नुकसान झाले आहे.
गोवरी येथील सुनील देवाळकर यांच्या शेतातील गोठयावरील टिना उडून गेल्या.तर गोवरी येथे विद्युत जनित्रावर मोठे झाड कोसळल्याने गोवरी परिसरातील वीज पुरवठा १२ तासानंतरही खंडित होता. काही शेतकऱ्यांनी कापूस पिकांसह शेतमाल अंगणात ठेवला होता. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
भद्रावती तालुक्यात गारपीट
भद्रावती : भद्रावती तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस बरसला. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. यामुळे शेतकºयांसह अनेक घरांचे तसेच शासकीय मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील चिरादेवी येथे पावर ग्रिड येथून परडी येथे जाणारे तीन टावर खाली पडल्याने पारेशन कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या शेतमालाचेही नुकसान झाले असून गावासह शहरातसुद्धा घरांची छते तसेच जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले. वेकोलि एकता नगर परिसरात तबल आठ झाडे उन्मळून पडली. काही भागाचे विद्युत खांब पडल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले.
आंबा पिकांना मोठा फटका
पळसगाव : पळसगाव परिसारातील पळसगाव, कळमना, आमडी इतर भागात काही शेतकºयांनी आपल्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना केली. बहर जाऊन आंबे लागायला सुरुवात झाली. परंतु शनिवारी पहाटे पडलेल्या वादळी पावसामुळै आंबे पूर्णत: परिपक्व होण्याच्या आधीच खाली पडले. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, पळसगाव परिसरात आमडी गावात अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीबरोबरच लाल मिरचीचे उत्पादन घेतले. लॉकडाउनमुळे मिरची घरातच पडून आहे. बाहेर ठेवलेली मिरची पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बल्लारपुरातील वीज पुरवठा खंडित
बल्लारपूर : शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारपुरात वादळासह मुसळदार पावसाने हजेरी लावली. वादळ व पाऊस सुमारे ५ वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान त्या काळात वीज पुरवठाही बंद होता. यात रस्त्यावरील अनेक झाडे पडली. अचानक आलेल्या या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.