१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:11+5:30
जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा, तालुकानिहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने तब्बल ४९ वर्षांनंतर प्रथमच बदल केला असून तालुक्यांचे वर्षभरातील नविन दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला यापुढे दुष्काळ व पूरस्थिती जाहीर करताना या सरासरी पर्जन्यमानाचाच आधार घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान सिंदेवाही (१२८९ मिलिमीटर) तर कोरपना तालुक्याचे सर्वात कमी (९९९.८० मिलिमीटर) निश्चित झाले आहे.
जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती. १९६१ ते २०१० या कालावधीतील राज्याच्या सर्व तालुकानिहाय सरासरी पर्जमान्यमानाचा विचार करण्यात आला होता. या पर्जन्यमानाचे विश्लेषण करून हवामान विभागाने न्निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमाही नव्याने निश्चित केले आहे.
पर्जन्यमानाची अशी होते नोंद
सर्वच तालुक्यात मंडळस्तरावर पर्जन्यमान मापक यंत्रे बसविली आहेत. या यंत्रांची देखभाल व नोंदी करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. तालुका यंत्रणेकडून घेतलेल्या नोंदी वरिष्ठांकडे पाठविल्या जातात. दरवर्षी मान्सून कालावधीत शासनाकडून तयार केलेले पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार होणारेअहवाल जिल्हा व तालुकानिहाय अहवालावर आधारीत असतात. याचे विश्लेषण हवामान विभाग करते. यापुढे जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हवामान विभागाची सरासरी नवीन पर्जन्यमान आकडेवारी अधिकृत मानली जाणार आहे.
भारतीय हवामान विभागाने १९६९ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमान जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले. यासंदर्भात जारी केलेला शासन निर्णय प्राप्त झाला आहे. दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हे नवीन सरासरी पर्जन्यमान आधारभूत ठरणार आहे.
- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर