लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे प्रवासावरही निर्बंध आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेसाठी काही खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. ज्या प्रवाशांकडे अँटिजन रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यालाच ट्रॅव्हल्स बसमध्ये बसण्याची परवानगी आहे. त्यातही मास्क व सॅनिटायझर बंधनकारक आहे. प्रवासी उतरल्यानंतर त्याच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येत आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समालकांनी लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी चंद्रपूर येथून डीएनआर, पर्पल, हमसफर, गणराज, महाकाली अशा अनेक ट्रॅव्हल्स कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात धावत होत्या. परंतु, आता त्याला मर्यादा आली आहे. चंद्रपूरवरुन केवळ नागपूर व पुणेसाठी दहाच्या जवळपास ट्रॅव्हल्स धावत आहेत. बाकी ट्रॅव्हल्स मागील दोन महिन्यांपासून बंदच आहेत. परिणामी कोरोनामुळे हा व्यवसाय डबघाईस आला आहे. प्रवासी मिळाल्यास एखादी फेरी धावते. त्यातही मोजक्याच प्रवाशांना प्रवेश असल्याने उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे चालक, क्लीनरचा पगार कसा करायचा असा प्रश्न दर महिन्याला ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवासीही स्वत:ची काळजी घेत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. चंद्रपूरवरून नागपूरकडे धावणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पाहणी केली असता यामध्ये मोजकेच प्रवासी आढळून आले. तसेच प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसून आले.
मास्कचा होतोय वापर शहरातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या जागेची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले.
कारवाईसाठी नेमले पथकखासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. ट्रॅव्हल्सधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते.
ई-पास बंधनकारकपरजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्या ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. जर प्रवाशांकडे इ-पास नसेल तर त्याच्या अँटिजन चाचणीचा अहवाल, आधार कार्ड आवश्यक आहे. तेव्हाच त्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकांनी सांगितले.