१७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:30+5:30
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी देशभरात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आरटीईची सोडतीमध्ये निवडलेल्या १७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि पडताळणी या संदर्भातील निर्णय हा १५ एप्रिलनंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील १८०७ जागांसाठी चार हजार ४१४ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी करण्यात आली. यात १७४२ जणांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी त्यांना ३१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे १५ एप्रिल नंतरच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन होणार आहे.
नामांकित शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली. ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मॅसेज गेलेत. सोबत प्रतीक्षा यादी देखील दिली आहे. पालकांना प्रवेशांसाठी ३१ मार्च ही अंतिम यादी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकीया बंद असल्याने जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश रखडला आहे.
कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन रखडले
ज्यांची लॉटरीमधून निवड झाली आहे. त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतर होईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचे देशात कहर माजविल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरच ही शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.