अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:25 IST2026-04-20T10:25:14+5:302026-04-20T10:25:47+5:30
या अतिवृष्टीमुळे पिकांवर परिणाम होऊन नासाडी वाढू शकते, असेही सांगण्यात आले

अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
जयदेव वानखडे, जळगाव जामोद (जि. बुलढाणा): महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत सोमवारी, २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले. गटमांडणीचे प्रणेते चंद्रभान महाराज यांच्या परंपरेतील पुंजाजी महाराज व सहकारी सारंगधर महाराज यांनी हे भाकीत मांडले.
यंदाच्या भाकितानुसार, सर्वसाधारणपणे पिकांची स्थिती चांगली राहणार असली तरी अतिवृष्टी व रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांना अपेक्षित समाधान मिळणार नसल्याचे संकेत देण्यात आले. पावसाळ्याच्या चार महिन्यांबाबत अंदाज व्यक्त करताना जूनमध्ये कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा अधिक, तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीचा कहर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे पिकांवर परिणाम होऊन नासाडी वाढू शकते, असेही सांगण्यात आले.
राजकीय भाकितात सत्तास्थानी असलेले नेतृत्व कायम राहील, असे संकेत देण्यात आले. मात्र नैसर्गिक संकटे व शत्रूंकडून होणाऱ्या तणावामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण येईल, तसेच आर्थिक स्थितीतही चढ-उतार दिसतील, असे भाकीत व्यक्त करण्यात आले. गटामध्ये ठेवलेल्या घागरीवरील पुरी गायब आढळल्याने पृथ्वीवर मोठ्या संकटांची शक्यता वर्तविण्यात आली. पाण्याची उपलब्धता चांगली राहील, गुराढोरांसाठी चारा उपलब्ध होईल, पिकांचे उत्पादन वाढेल व बाजारभावही समाधानकारक राहतील, असे सकारात्मक संकेतही देण्यात आले. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भेंडवळ घटमांडणी ऐकण्यासाठी विदर्भ, खान्देश, मराठवाडा तसेच मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. हवामान विभागाचे आधुनिक अंदाज उपलब्ध असतानाही सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीवर शेतकऱ्यांचा दृढ विश्वास कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.