शेतात काढणीला मजूर अन् बाजारात मालाला भाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:45+5:30
चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही.
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शेतात काढणीसाठी मजूर नाही आणि बाजारात माल विकायला जावे तर भाव नाही, अशा स्थितीत लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील शेतात भाजीपाला पीक उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम असला तरी शेतकरी मात्र शासन प्रशासनाच्या लढाईला खंबीरपणे साथ देत आहेत.
चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात राबायला कोणी मजूर तयार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून पिकांची काढणी केली आणि बाजारात नेले तर त्याला दर नाही. बाजारात वाहन जाईपर्यंत विविध ठिकाणी अनंत अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोच. त्यामुळे आता शेतकºयांनी आपला भाजीपाला परिसरातील गावामध्येच विकण्याचा निर्धार केला आहे. मालाला भाव मिळत नसला तरी काढणीला आलेले पीक काढणे गरजेचे असते.
सध्या ठोक बाजारात भाजीचे भाव अर्ध्यावर आलेले आहे. मिरची, भेंडी केवळ १५ रूपये किलोने विकावे लागत आहे. कारल्यासारखे पीक पडल्या भावाने जात आहे. परराज्यात जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मुख्य बाजारपेठ बंद पडल्याने बाहेरगावचे नागरिकही पालांदूरात येत नाही. अपेक्षित विकला जात नाही. बाजार गावाच्या बाहेर भरविला जात असल्याने कोणी तिकडे फिरकतही नाही. टमाटर वांगे, फुलकोबी यातून तर हाती काही उतरतही नाही.
उपाययोजनांची गरज
भंडारा जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला परप्रांतात विक्रीला जात होता. त्यामुळे शेतकºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संकटाने सगळे मार्ग शांत झाले आहे. असलेला भाजीपाला विकेल याची कोणतीही खात्री नाही. शासनाने पुढाकार घेवून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी सांगितले.