लाखनीत नऊ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:21+5:30
१४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शहरातील पोस्ट ऑफीस परिसरात राहणाऱ्या आशीष राजाभोज यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करीत नऊ लक्ष ४२ हजार रुपयांचा सोनेचांदीचा ऐवज व एक लाखांची रोकड चोरुन नेली. ही घटना शनिवारला उघडकीस आली. या घटनेने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहीतीनुसार, आशिष राजाभोज व त्यांचे पूर्ण कुटूंब गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथे नातलगाच्या अंत्यसंस्कार विधीसाठी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजाभोज कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांची मुलगी त्यांच्या भावाकडे राहायला गेली होती. १४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.
दुसºया रुममध्ये असलेले सोन्याचे साहित्यही चोरुन नेले. तसेच रोकड ११ हजार रुपये लंपास केले. असा सर्व मिळून ३१६ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी घराच्या समोरील दाराची कोंडी तथा सेंट्रल लॉक तोडून प्रवेश केला होता.
घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे, लाखनीचे पोलीस निरीक्षक डामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र म्हैसकर यांनी भेट दिली. घटनास्थळाहून फॉरेन्सीक लॅबच्या चमूने नमुणे तथा हातांचे ठसे गोळा केले आहेत.
लाखनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर करीत आहेत.
घटनांमध्ये वाढ
शहरासह ग्रामीण भागामध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. चोरांचा सुगावा लागत नसल्याने चोरांचे धाडस वाढले आहे. पोलीस तपास करीत असून सुगावा लागत नाही. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.