मिटेवानी येथील मुख्यमंत्री नळ योजनेचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:44+5:302021-03-09T04:37:44+5:30

खापा : तुमसर तालुक्यातील मिटेवानी या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सन ...

Inferior work of Mukhyamantri Nal Yojana at Mitewani | मिटेवानी येथील मुख्यमंत्री नळ योजनेचे काम निकृष्ट

मिटेवानी येथील मुख्यमंत्री नळ योजनेचे काम निकृष्ट

खापा : तुमसर तालुक्यातील मिटेवानी या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही सन २०१८-१९ मध्ये राबविण्यात आली. सदर योजनेची अंदाजपत्रकात किंमत ७८ लक्ष ७४ हजार ५९१ रुपये असून, सदर योजनेचे भंडारा येथील एका कंत्राटदाराला अटी व शर्तीच्या देण्यात आले, परंतु सदर कंपनीच्या हेळसांडपणामुळे सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहेत.

मुख्यमंत्री पेयजल योजनेचे पाणी पुरविण्याचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. जलवाहिनीचे कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदर काम हे १८ महिन्यांच्या अटी व शर्तीवर कंत्राटदाराला देण्यात आले, परंतु कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे तीन ते चार वर्षे लोटून गेली, काम पूर्णपणे झाले नाही. सदर कामाची देयके थांबविण्यात येऊन कामाची चौकशी करून, दोषी अधिकारी व कंत्राटदार कायदेशीर कारवाई करावी, असे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून उपसरपंच बंडू पारधी यांनी केली आहे.

मिटेवानी येथील प्रादेशिक नळ योजनेचे रूपांतर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या योजनेच्या गावकऱ्यांना करण्यात येणार होता, परंतु कंत्राटदाराच्या बेजाबदार व निष्काळजीपणामुळे मुख्यमंत्री योजनेला ग्रहण लागले आहे. परिणामी, गावकऱ्यांना स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सदर योजना ही सन २०१८ ते २०१९ या १८ महिन्यांच्या कालावधीमध्ये योजनेचे पूर्ण काम करायचे होते. तीन वर्षे लोटूनही काम पूर्ण झालेले नाही. अशा बेजबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करून अर्धवट कामाचे बिल थांबविण्यात यावे. जलवाहिनी घालताना नालीचे खोदकाम कोठे दीड फूट तर कोठे दोन फूट खोदकाम करण्यात आले. खोदकामामुळे पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे गावातील लोकांना पाणी मिळणार नाही. पाइपही कमी दर्जाचे वापरण्यात आले.

कोट

‘स्वच्छ पाणी मिळणार होते, परंतु अधिकारी व कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या गावातील नागरिक स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. अशा कंत्राटदार वर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.’

- बंडू पारधी, (उपसरपंच), तक्रारदार, मिटेवानी

कोट

‘संबंधित कामाचा अहवाल वरिष्ठांना कळविण्यात येईल. कंत्राटदाराकडून उर्वरित काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल. काही तांत्रिक अडचणीमुळे कामाला विलंब झाला.’

देवगडे - शाखा अभियंता पाणीपुरवठा विकास

Web Title: Inferior work of Mukhyamantri Nal Yojana at Mitewani