पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:01:06+5:30
बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो.
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात यावर्षी रविवारी २४ मे रोजी प्रवेश होत असून रोहिणी नक्षत्रात यंदाचा मान्सून बरसेल, या आशेने शेतकऱ्यांनीही मान्सूनपुर्व कामाला मोठ्या तन मन धनाने सुरुवात केली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या तप्त उन्हामुळे शेतकऱ्यांना आता पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील काडी कचरा गोळा करणे, धुरा साफ करणे, शेतात शेणखत घालणे, नांगरणी करून ठेवणे इत्यादी आवश्यक कामे शेतकरी मोठ्या आशेने व आनंदाने करताना दिसत आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस आजही पंचांगातील पावसाचे पारंपरिक नक्षत्रे त्यांची वाहने तसेच पक्षाची झाडावरील घरटी यावरूनच पावसाचा अंदाज बांधत असतो. त्या नुसार शेतीच्या कामाला सुरुवात करतो.
यंदा रोहिणी नक्षत्रात पहिला पाऊस बरसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंगाला भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता वातावरणात बदल होत आहे. लवकर पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकºयांनीही मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. पंचांगानुसार पावसाची एकूण बारा नक्षत्रे आहेत. त्यानुसार नक्षत्राचे वाहन, पाऊसमान अंदाजे सांगितले आहे. यावर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्रापासून होत आहे. ७ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन म्हैस आहे. पाऊस चांगला होईल तर २१ जूनपासून आद्रा नक्षत्र लागत असून त्याचे वाहन घोडा आहे. जुलैपासून पुनर्वसु नक्षत्र सुरु होत आहे. वाहन उंदीर आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा पंचांगानुसार विविध अनुमान सांगितले आहे
अड्याळ आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी संकटकाळात नेरला उपसा सिंचनाचा मोठा आधार मिळत आला. परंतु दरवेळी काही तरी विषय व्हायचा आणि जेव्हा शेतकरी रस्यावर यायचे त्यावेळी पाणी मिळायचे. शेतकऱ्यांना अडयाळ आणि परिसरात सध्या शेतकरी एकच चर्चा करत आहेत ते म्हणजे नेरला उपसा सिंचन सुरु व्हायला गतवर्षी पाण्याची पातळी नव्हती, निदान आता तरी पाण्याची पातळी उपलब्ध करून ठेवली तर पुढे संकटकाळात हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो आता यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.