गरिबांना मोफत अन्नधान्यांचे वाटप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:31+5:30
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा): संपूर्ण जग भयभीत झालेल्या कोरोनावर उपाययोजनेसाठी आमदार निधीचा उपयोग तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात करणार आहे. विविध उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच लेखी पत्र दिले जाईल. याशिवाय स्वखर्चातून क्षेत्रातील अत्यंत गरीब परिवारांना तांदूळ, गहू, तेल व कडधान्यांचे वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणा आमदार राजू कारेमोरे यांनी पालोरा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका बैठकीत केली.
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकरी, दुग्ध उत्पादक व धान खरेदी केंद्रांना येणाऱ्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या. अडचणींवर मंथन करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पालोरा येथील आठवडी बाजाराला भेट देत व्यावसायिक व ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या. सर्वांनी सामाजिक अंतर ठेवून तसेच पाणी व साबणाने हात घेऊन कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा दिला. यावेळी लोकमत ई- पेपर आवृत्तीचे वाचन करून 'लोकमत'ने घेतलेल्या लोक जागृतीच्या संकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
बैठकीला आमदार राजू कारेमोरे, सरपंच महादेव बुरडे, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, ठाणेदार निलेश वाजे, अमरकंठ लांडगे, सुखदेव मुरकुटे, प्रकाश भोयर, धान खरेदी केंद्राचे ग्रेडर रहांगडाले, डॉ. अभय शेंडे, ग्रामपंचायत सदस्य रोशन कडव, भोजराम तिजारे, मनीषा बुरडे, रवींद्र ठवकर, भैया कनोजकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजू कारेमोरे म्हणाले, सध्या कोरोनावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे काळजी घेणे, शासन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. संचार बंदीच्या काळात कोणत्याही सुविधाविणा नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणांपासून नागरिक रस्त्याने पायी गावांकडे परत जातांना दिसत आहेत. त्यांनी सावधानता बाळगून सर्वांना मदतीचे आवाहन केले. त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून स्वत: होम क्वारटाईनमध्ये रहावे. कोरोनाचा प्रसार बघता गाफील राहून चालणार नाही.