भंडारा रोड रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:51+5:30
भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील भंडारा रोड स्थानक जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वात सोयीस्कर आहे. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे.
भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. भंडारा बसस्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यत वेळेवर पोहोचणे प्रवाशांना अनेकदा शक्य होत नाही. याच मार्गाने ऑटोरिक्षा वेगाने धावत असतात. इतर वाहनांची देखील मोठी वर्दळ असते. मोठ्या खड्यांंमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक व्यावसायीकांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली आहे. अरुंद रसत्यामुळे रेल्वे येते तेव्हा प्रवाशांची गर्दी आणि अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा मोठी धावपळ करावी लागते.
पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचलेले असते. त्यातूनच मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायतने कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
वरठी रेल्वेस्थानक ते भंडारा बस बसस्थानकापर्यंत धावधाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपक्षा आधिक प्रवासी बसविले जातात. त्यांचा वेगही अधिका असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ऑटोरिक्षा चालक प्रवाशांशी हुज्जत घालत असतात. परंतु याकडे पोलीस आणि रेल्वे विभागाचे कायमच दुर्लक्ष दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वेगाड्या नियमित येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. रेल्वेस्थानक परिसरात अस्ताव्यस्त लागणाºया वाहनांच्या रांगा याचा देखील अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत तिकीट विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे एक चौकशी कक्षाची स्थापना करुन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्वक आहे. त्यासोबतच विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी विशेष सुविधा तयार करण्याची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोबाईल चार्जिंगसारख्या प्राथमिक सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविणे गरजेची आहे.