अवकाळी पावसानंतर जिल्हा कडाक्याच्या थंडीने गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:30+5:30
जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. तापमानात कमालीची घट झाली असून दिवसाच्या तापमानातही मोठी घट नोंदविली जात आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवकाळी पावसानंतर आकाश निरभ्र झाले आणि थंडीत वाढ झाली. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवायला लागली. पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला असून रात्री तर घराबाहेर निघणेही कठीण होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असून उब मिळविण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. तापमानात कमालीची घट झाली असून दिवसाच्या तापमानातही मोठी घट नोंदविली जात आहे. पहाटेपासूनच गार वारे वाहत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी कायम आहे. रात्री तर घराबाहेर निघणेही कठीण होते.
या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही शेकोट्या पेटविल्याचे चित्र आहे. सकाळ-सायंकाळ शेकोट्या पेटविल्या जात असून प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या वातावरणाचा दबा आजाराने ग्रस्त रुग्णांना कमालीचा त्रास होत आहे. लहान बालकांमध्ये सर्दी, पडसा, खोकला यासह तापीची लक्षणे दिसत आहेत.
कडाक्याच्या थंडीचा फायदा रबी पिकांना होणार, असे जानकार शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड होत असून या पिकासाठी थंडी उपयुक्त ठरत आहे. हरभरा आणि इतर रबी पिकांसाठी थंडी उपयुक्त असली तरी कडाक्याच्या थंडीने तुरीचा फुलोर जळण्याची भीती आहे. भाजीपाला पिकांना मात्र या कडाक्याच्या थंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतशिवारात सध्या उन्हाळी धानाच्या रोवणीचा हंगाम सुरू असून या कडाक्याच्या थंडीमुळे मजूर शेतात येण्यास तयार नाही