"जनता माझ्यासोबतच"; मस्साजोगमध्ये विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:48 IST2026-04-29T12:46:05+5:302026-04-29T12:48:30+5:30
मस्साजोग पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा 'धडाकेबाज' विजय; अश्विनी देशमुखांचा ९२ मतांनी पराभव

"जनता माझ्यासोबतच"; मस्साजोगमध्ये विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
बीड: राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांच्या फरकाने पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या स्वरूपानंद यांनी यावेळी मोठी मजल मारत मस्साजोगच्या राजकारणात आपली ताकद सिद्ध केली आहे.
काय म्हणाले स्वरूपानंद देशमुख?
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी आपल्या विजयाचे श्रेय ग्रामस्थांना दिले. ते म्हणाले, "मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की माझे मतदार माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन ते आज सिद्ध केले आहे. माझ्यावर अनेक आरोप झाले, पण माझी जनता माझ्यासोबत ढाल बनून उभी राहिली. हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे."
न्यायाच्या लढाईत सोबत असणार
दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी होता. त्यावर भाष्य करताना स्वरूपानंद म्हणाले, "मी अगोदरही संतोष देशमुखांच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो आणि इथून पुढेही या लढाईत त्यांच्या कुटुंबासोबत असेन. आगामी काळात गावातील विकासकामे कोण करू शकतो, हे लक्षात घेऊनच जनतेने मला कौल दिला आहे."