बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूकीला उभा राहायचे आहे का? खा. बजरंग सोनवणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:30 IST2026-04-12T16:29:46+5:302026-04-12T16:30:03+5:30
बीड-परळी रेल्वेवर खा. सोनवणेंचे मोठे भाष्य!

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूकीला उभा राहायचे आहे का? खा. बजरंग सोनवणेंचा सवाल
नितीन कांबळे/ कडा:बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत खा. बजरंग सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रेल्वे दोन महिन्यांत सुरू होईल असे सांगितले जात आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक लढवायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चार जिल्ह्यांची बैठक आणि रेल्वेचा मुद्दा
दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांची रेल्वे संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत बीड-परळी रेल्वे प्रकल्प लवकरच सुरू होईल, असा दावा करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना खा. सोनवणे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कलेक्टरची भूमिका संशयास्पद
कडा येथे माध्यमांशी संवाद साधताना सोनवणे म्हणाले, रेल्वे दोन महिन्यांत येणार असल्याचे सांगितले जात आहे, पण कलेक्टरची भूमिका पाहता ते निवडणुकीसाठी तयारी करत आहेत का, असा प्रश्न पडतो.
मस्साजोग सरपंच निवडणुकीवरही भाष्य
मस्साजोग येथील सरपंच निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, धनंजय देशमुख परिपक्व आहेत. ते केस मागे घेणार नाहीत. संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. ही निवडणूक बिनविरोध होणारच आहे. धनंजय देशमुख यांच्यावर दबाव टाकला जात असल्याच्या चर्चेबाबत त्यांनी, हा वेगळा विषय आहे, असे म्हटले.