'ते' १८ अश्लील व्हिडिओ, ३९ फोटो अन् आठ पीडिता ! ...आणि सुरू झाले राजकारण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:10 IST2026-04-19T15:07:40+5:302026-04-19T15:10:05+5:30
Amravati : खरंतर या प्रकरणात राजकारण मुळीच अपेक्षित नाही. पण ते सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हे 'लव्ह जिहाद' असल्याचे आक्रमकपणे सांगितले.

'They' 18 pornographic videos, 39 photos and eight victims! ...and politics began!
गजानन चोपडे
लोकमत न्युज नेटवर्क
अमरावती : खरंतर या प्रकरणात राजकारण मुळीच अपेक्षित नाही. पण ते सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हे 'लव्ह जिहाद' असल्याचे आक्रमकपणे सांगितले. इतकेच नव्हे तर १५० पीडितांचे लैंगिक शोषण झाल्याचा दावा केला. अवघ्या काही तासांतच तो फोल ठरला, हा भाग वेगळा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील स्थानिक नेत्यांचे कान टोचले. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पोलिसांना द्या, चुकीचे विधान करून समाजात तेढ निर्माण करू नका, असे स्पष्ट बजावले. मुळात हे प्रकरण चव्हाट्यावर कसे आले? या प्रश्नाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा समोर आलेल्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत.
पीडितेला कुठलीही जात, धर्म नसतो, असे ठणकावून सांगणारे पोलिसच जेव्हा परतवाडा व्हिडिओ कांड प्रकरणातील सर्व आठ पीडिता अल्पसंख्याक समाजाच्या असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या चमूला सांगतात, तेव्हा या प्रकरणाचा संबंध 'लव्ह जिहाद'शी उरतोच कुठे? असा सवाल उपस्थित करून आयोगाच्या अध्यक्षांनी अफवा पसरवणाऱ्यांची पार हवा काढून टाकली. परतवाड्याच्या क्रूरकर्मा अयानने आठ पीडितांसोबत जे कृत्य केले, ते जेवढे लज्जास्पद, घृणास्पद आहे, तेवढेच संतापजनकही. या नराधमाने त्या मुलींचे केवळ आयुष्यच उद्ध्वस्त केले नाही तर त्यांचे प्रचंड सामाजिक नुकसान केले आहे. आठ आरोपी अमरावती ग्रामिण पोलिसांच्या कोठडीत आहेत. प्रकरणाची एक-एक कडी तपासादरम्यान खुलत असल्याने हे व्हिडिओ कांड अधिक गडद होत आहे.
त्याने अमरावतीतील एका भाड्याच्या फ्लॅटला आपल्या पाशवी वासनेचा अड्डा बनवला. मानव सुगंधे हा आरोपी स्वतःच भाड्याने घेतलेला हा फ्लॅट अयान अहमदला 'तासिका तत्त्वावर' मुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी पुरवत होता. मुळात हे प्रकरण चव्हाट्यावर कसे आले? या प्रश्नाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा समोर आलेल्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत. यातील आरोपी अयान आणि उड़झेर खान दोघे मित्र आहेत. अयानने आपल्या स्वैराचारासाठी अनेकांकडून पैसे घेतले होते. त्यातील उड़झेर खान एक. काही दिवसांपूर्वी उड़झेरने त्याच्या मोबाईल फोनमधून 'ते' व्हिडिओ चोरले. ते आपल्या फोनमध्ये घेतले. पुढे काही दिवसांनी त्यांच्यात पैशावरून वाद झाला. अयान टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच त्याला अद्दल घडवण्यासाठी उझेरने ते आपल्या पाच मित्रांना फॉरवर्ड केले. त्यांनी ते परतवाड्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले अन् हे प्रकरण वाऱ्यासारखे राज्यभर पसरले. यातील आठपैकी काही मुली अल्पवयीन आहेत. त्यांच्यासोबत अश्लील चाळे करतानाचे अयानचे हे भयाण रूप समोर आले. मात्र नको ती बदनामी म्हणत आणि भीतीपोटी एकही पीडिता पुढे आली नाही. मात्र ग्रामीण पोलिसांनी जिद्द सोडली नाही. अखेर शनिवारी एक अल्पवयीन पीडिता समोर आली. आता तिच्या जबाबावर नराधम अयानचे भवितव्य अवलंबून असेल.
बरे झाले; सोनाराने टोचले कान !
१३ एप्रिल रोजी खा. अनिल बोंडे व शिवराय कुलकर्णी यांनी एसर्पीची भेट घेतली. लव्ह जिहादचा आरोप केला. पुढे यात नवनीत राणा सहभागी झाल्या. कुणाचा दावा १८० मुली अन् ३५० व्हिडिओ तर कुणाचा त्या सर्व पीडिता आपल्याच असल्याचा. पहिल्या दाव्यातील हवा पोलिसांनी काढली तर दुसरा दावा प्यारे खान यांनी फोल ठरवला. शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा, बोंडे व प्यारे खान यांची चक्क मीडियासमक्षच चांगलीच कानउघाडणी केली. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पोलिसांना द्या, चुकीचे विधान करून समाजात तेढ निर्माण करू नका, असे स्पष्टपणे बजावले. यात एक चांगले झाले. पालकमंत्र्यांच्या रूपात सोनाराकडूनच कान टोचले गेले!
...आणि सुरू झाले राजकारण !
निवडणुकीच्या काळात गठ्ठा मतांसाठी दाढ्या कुरवाळणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांचे नेते आठ आरोपींना अटक झाल्यानंतर आता बोलू लागले आहेत, असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केला, तर भाजप सर्वसामान्य नागरिकांचे डोके भडकवण्याचे काम करत आहे. त्यांना परतवाडा येथे दंगली घडवायच्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. तिकडे तोच धागा पकडत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. राणांवर आगपाखड करताना खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना खरे सनातनी नेते सांगत त्यांचे कौतुक केले, हे विशेष. राणाही शांत बसल्या नाहीत त्यांनी लगेच प्यारे खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरंतर या प्रकरणात राजकारण मुळीच अपेक्षित नाही. पण ते सुरू आहे. आश्चर्य म्हणजे, परतवाड्याच्या प्रकरणात जे मैदानात उतरले आहेत, ते मात्र भानखेडा सामूहिक अत्याचार प्रकरणात मौन धारण करून होते.