जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:00 AM2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:57+5:30

कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Strict curfew in the district from Sunday | जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी

जिल्ह्यात रविवारपासून कठोर संचारबंदी

Next
ठळक मुद्दे९ ते १५ मे, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन, फक्त मेडिकल स्टोअर, दवाखाने राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता, संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ ते १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केला.
कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींना नियोजन करण्याचे आदेश आहेत. दूध संकलन केंद्रे व घरपोच दूध वितरण सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान करता येईल.
कृषी अवजारे व उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत, बांधापर्यंत करण्याची जबाबदारी कृषिसेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. या प्रक्रियेचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश दिले आहेत.

परवानगी दिलेल्या वाहनांना इंधन मिळेल
परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल. तसे आदेश पेट्रोल पंपधारकांना देण्यात आले आहेत. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा यांच्याकरिता ते उपलब्ध करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रोज अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.

बाजार समिती, आठवडी बाजार, भाजी मार्केट बंद
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू राहील.

हे असेल बंद

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृहे, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण चालू राहील, मात्र नियोजनाची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.

हे असणार सुरू
सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर, दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा २४  तास सुरू ठेवता येईल. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.

घरपोच पार्सल सेवा
हॉटेल, रेस्टॉरेंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.

शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद 
सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालये यांचादेखील समावेश राहील. त्यांना ऑनलाईन कामकाज करता येईल. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील. मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. 

विशेष परवानगी कोणालाही मिळणार नाही
सर्व आस्थापनांसाठी हे आदेश असून, कोणत्याही क्षेत्रात कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी नाही. विशेष परवानगी १५ मेपर्यंत कोणालाही मिळणार नाही. सर्वांनी दक्षता त्रिसूत्रीचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवेची वाहनांना परवानगी
- सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. रुग्णांसाठी रिक्षा व खासगी वाहनास परवानगी राहील. तसे नियंत्रण वाहतूक पोलिसांनी ठेवण्याचे आदेश आहेत.
- मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणाऱ्या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास ई-पास काढून वाहतूक करता येईल.

बाजार समिती, आठवडी बाजार, भाजी मार्केट बंद
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू राहील.

लग्न समारंभात १५ व्यक्तींना मुभा
सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नात मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा दाेन तासांत आटोपणे आवश्यक आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी. लग्न समारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याची असेल.

बँका, पोस्टही दुपारपर्यंत सुरू
सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत.
सेतु केंद्र, दस्त नोंदणी बंद
सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील.
एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू
एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूत गिरणी येथे केवळ मूलस्थानी पद्धतीने कामकाज सुरू राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची असेल.
ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा  
दुकानदार, हॉटेलमार्फत घरपोच सेवा पुरविणाऱ्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. कर्मचाऱ्यांचा निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल आवश्यक आहे.
गॅस नोंदणी ऑनलाईन करावी
गॅस एजन्सीमार्फत सिलिंडरचे वितरण होईल. ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. पर्यवेक्षणाची जबाबदारी डीएसओंची राहील.
अभ्यागतांना प्रवेश नाही
सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी टोल फ्री क्रमांकावर (ई-संवाद टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ६३९६) संपर्क साधावा.

 

Web Title: Strict curfew in the district from Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.