अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह कोसळला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:55+5:30
अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने संत्री गळून या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शनिवारी हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजगाव येथे एका युवकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर सोयाबीन सोंगलेल्या शेतकऱ्यांची पावसाने परीक्षा घेतली.
अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने संत्री गळून या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली. मोर्शी तालुक्यात अंबाड्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. धारणी परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने फेर धरला. धारणीत पाऊस बेपत्ता होता. दर्यापूर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. येवदा परिसरात विजेच्या कडकडे सह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. बडनेरयात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने रस्ता निर्मितीमुळे उडणारी धूळ खाली बसली. चुरणी परिसरात वादळी वारे वाहिले व जोरदार पाऊस झाला. अंजनगाव सुर्जीत ढगाळ वातावरण दिवसभर होते. पाऊस मात्र अगदी किरकोळ झाला.
नांदगावात सोयाबीन उत्पादकांची दाणादाण
नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नांदगाव परिसरात जोरात पाऊस कोसळला. बऱ्याच शेतकऱ्यांनी उघाड मिळाल्याने कापणी केलेले सोयाबीनचे पीक पावसात भिजले. काही शेतात सोयाबीनची गंजी जमिनीवर पडून आहे. या गंजीतही पाणी शिरले.
अचलपुरात विजांसह जोरदार पाऊस
अचलपूर : शहरासह तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. टक्कर चौक, बडी संगत,माळवेश पुरा, अकबरी चौक, चावल मंडी, तहसील रोड या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही वेळेकरिता वाहतूकदेखील बंद होती.