कोरोना डेथ ऑडिट, 80 टक्के रुग्णांना आधीपासून आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST2021-06-21T05:00:00+5:302021-06-21T05:00:33+5:30
जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात १० मृत्यू, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये १५४, ऑक्टोबरमध्ये ७२, नोव्हेंबरमध्ये १४, डिसेंबरमध्ये १८, जानेवारीमध्ये २२, फेब्रुवारीमध्ये ९२, मार्चमध्ये १६४, एप्रिलमध्ये ४१०, मेमध्ये २८९ व जून महिन्यात १९ दिवसांत ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना डेथ ऑडिट, 80 टक्के रुग्णांना आधीपासून आजार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे १,५४० रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ८० टक्के रुग्णांना संसर्गाच्या आधीपासून आजार असल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात १० मृत्यू, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये १५४, ऑक्टोबरमध्ये ७२, नोव्हेंबरमध्ये १४, डिसेंबरमध्ये १८, जानेवारीमध्ये २२, फेब्रुवारीमध्ये ९२, मार्चमध्ये १६४, एप्रिलमध्ये ४१०, मेमध्ये २८९ व जून महिन्यात १९ दिवसांत ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला. यासाठी विविध कारणे असली तरी मृत रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना सहव्याधी असल्याची बाब आरोग्य विभागाचे ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झालेली आहे.
अंगावर लक्षणे काढणे, नमुने उशिरा देणे, रोगप्रतिकारशक्तीत घट यामुळे अनेक रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थिती सहव्याधी रुग्णांसाठी धोकादायक ठरली आहे.
प्रशासनाद्वारा सातत्याने आशा व एएनएम पथकाद्वारे कॉमर्बिडिटीचे रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये नोंद झालेल्या रुग्णांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनदेखील करण्यात आले होते. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
मृतांमध्ये ७० टक्के रुग्ण शुगर, बीपीचे
जिल्ह्यात कोरोना संक्रमितांचे मृत्यूपश्चात झालेल्या ऑडिटमध्ये ७० टक्के रुग्णांना मधुमेह व रक्तचापासारखे आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्ग झाल्यानंतर वेळीच खबरदारी न घेतल्यास प्रकृती गंभीर होत असल्याचे दिसून येते. अनेक रुग्णांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय हृदयरोग, किडनी विकार यांसारखे १४ आजार दगावलेल्यांपैकी ८० टक्क्यांना आधीच होते.
उपचाराच्या पहिल्या २४ तासात ७८ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाची लक्षणे अंगावर काढणे ही बाब अंगलट येणारी आहे. यामध्ये उपाचारार्थ दाखल केल्याचे २४ तासांत ७८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. एक ते दोन दिवसांत ९२ व तीन ते सात दिवसांत ८५७ व त्यापेक्षा जास्त दिवसांत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.