नैसर्गिक संकटासमाेर सर्वच हतबल ठरतात. अशा वेळी संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी राजकीय पक्ष असाे वा सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने समाेर येऊन सामाजिक दायित्व निभावतात. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने मदतीचा हात समाेर करीत असताे. अशा वेळी मतभेद विसरून सर्वजण एकत्र येत असल्याचा शहराचा इतिहास आहे. २१ जुलैच्या मध्यरात्री अचानक माेर्णा नदीला पूर आला. शहराच्या सखल भागातील घरांमध्ये मुसळधार पावसाचे पाणी शिरले. नदीकाठची अनेक घरे जमीनदाेस्त झाली. काही क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, गाद्या, चादरी यांसह सर्व काही पाण्यात भिजले. पुराच्या धास्तीने अनेकांनी घर साेडून धार्मिक स्थळांचा आधार घेतला. या वेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीराम नवमी शाेभायात्रा समिती, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते धावून आले. जमेल त्या परीने मदत करण्यात आली असून शाेभायात्रा समितीच्या वतीने अद्यापही मदत केली जात असल्याचे चित्र आहे.
काळजी करू नका, आम्ही साेबत आहाेत!
श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात पूरग्रस्तांना दरराेज नाश्ता, जेवण व गरजूंना कपडे, साड्यांचे वाटप केले जात आहे. समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, ब्रिजमोहन चीतलांगे, मनीष बाछुका, गिरीश जोशी, पुष्पा वानखडे, चंदा ठाकूर, चित्राताई बापट, स्नेहल जोशी, मीरा वानखडे, रेखा नालट, मुक्ता बोपटे, जागृती साखरे, चंदा अग्रवाल, सुलभा पोद्दार, गीता सोनवणे, संतोषी शर्मा, स्वाती जोशी, शोभा खरोटे, वंदना कुरेकर, ज्योती कुलकर्णी, कल्पना अडचुले, गीतांजली शेगोकार, सारिका देशमुख, अलका देशमुख मदतीसाठी सरसावले आहेत. या वेळी पूरग्रस्तांना काळजी करू नका, आम्ही साेबत आहाेत, असा धीर दिला जात आहे.