बाजरी नव्हे यंदा शेतकऱ्यांची उडीद, मूग, सोयाबीन, तुरीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:28+5:302021-07-24T04:14:28+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात पिकाचा पॅटर्न बदलला असून बाजरीऐवजी कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणाऱ्या उडीद, मूग, ...

बाजरी नव्हे यंदा शेतकऱ्यांची उडीद, मूग, सोयाबीन, तुरीला पसंती
अहमदनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात पिकाचा पॅटर्न बदलला असून बाजरीऐवजी कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणाऱ्या उडीद, मूग, सोयाबीन, तुरीला प्राधान्य दिले आहे. ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाली असून ही सरासरी ११६ टक्क्यांहून अधिक आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक बाजरी, कापूस या पिकांना शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र यंदा हे चित्र बदलले आहे. शेतकऱ्यांनी उडीद, तूर, मूग अशा अल्प कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांना प्राधान्य दिले आहे. शिवाय या पिकांना हमीभावही असतो. त्यामुळे शेतकरी याकडे वळले असावेत.
जिल्ह्यात खरिपाची ५ लाख २२ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरीची ८५ हजार ३८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एरवी बाजरीची जवळपास सव्वा लाखाहून अधिक क्षेत्रावर पेरणी होत असते. यंदा त्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. ४९ हजार १३९ हेक्टरवर तूर, ७२ हजार ५५२ हेक्टवर उडीद, ४७ हजार ९२२ हेक्टरवर मूग अशी पेरणी झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे ओढा वाढल्याचे दिसून येते. कापसाचीही दीड लाखांच्या आसपास लागवड होत असते. त्यातही यंदा घट झाली आहे. १ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली.
-----
तेरा हजार हेक्टरवर कांदा
नगर, कर्जत, पारनेर, संगमनेर आदी तालुक्यांमध्ये कांदा पेरणीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तेरा हजार हेक्टरवर कांदा पेरणी झाली आहे. यात संगमनेरमध्ये सर्वाधिक ३ हजार ६८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. लाल/नाशिक कांदा म्हणून हा कांदा ओळखला जातो.
---
पीकनिहाय क्षेत्र..
पीक क्षेत्र (हेक्टर)
कापूस १०१३४०
बाजरी ८५३८३
तूर ४९१३९
मूग ४७९२२
उडीद ७२५५२
सोयाबीन ९९४१७
---------
कडधान्याची पिके अल्पावधीत चांगले उत्पन मिळवून देतात. नंतर रब्बी हंगामातील पिके घेणे शक्य होते. याशिवाय चांगला दरही मिळतो. त्या तुलनेत इतर पिके जास्त कालावधीची असतात. मग इतर पिके घेणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी कडधान्य पिकांनाच पसंती देत आहेत.
-विलास नलगे,
कृषी उपसंचालक, नगर
-----
आमच्या भागात खरीप हंगामात मूग घेतला जातो. आम्ही प्राधान्याने मूगच घेतो. दोन ते अडीच महिन्यात एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये सहज मिळून जातात. फारसे कष्टही करावे लागत नाही. त्यानंतर कांदा अथवा गहू अशी पिके घेता येतात.
-संदीप डोके
शेतकरी, श्रीगोंदा
----
२२सोयाबीन
अळकुटी परिसरात बहरलेले सोयाबीन.