कोपरगाव : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जिजामाता उद्यानातील सिमेंटची बाके, खेळणी, संरक्षक भिंती - जाळ्या काही अपप्रवृत्तीचा लोकांनी तोडल्या आहेत. कर रूपाने जमा झालेल्या नागरिकांच्या पैशांतून लाखो रुपये खर्च करून विकास करण्याचा प्रयत्न सुरू असतो. परंतु काहीजण अशा प्रकारे शहराचेच नुकसान करत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पदाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.
वहाडणे म्हणाले, गांधीनगर येथे नव्याने बांधलेल्या शौचालयात पायऱ्या, वायरिंग तोडून टाकले आहेत. काही ठिकाणी शौचालयाचे दरवाजेही चोरीला गेले. अनेकदा शौचालयातील बेसिन - भांडे फोडले जातात. अशाच प्रकारे नुकसान होणार असेल तर सार्वजनिक शौचालये कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते.