पितृपक्षामुळे भाज्यांनी खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:54+5:302021-09-24T04:24:54+5:30
--------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. ठोक बाजारातील दरांपेक्षा घराजवळ ...

पितृपक्षामुळे भाज्यांनी खाल्ला भाव
---------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. ठोक बाजारातील दरांपेक्षा घराजवळ मिळणारा भाजीपाला दुपटीपेक्षा जास्त किमतीला मिळत आहे. पितृपक्षासाठी लाल भोपळा, भेंडी, कारले, दोडके, काकडी, पालक अशा भाज्यांना मोठी मागणी आहे. सततच्या पावसामुळे भाज्यांची एकीकडे आवक कमी झाली आहे, तर दुसरीकडे मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे दिसते आहे.
गणेश विसर्जनानंतर भादप्रद कृष्ण प्रतिपदेपासून पितृपंधरवडा सुरू झाला. तिथीनुसार घरोघरी पितृपक्ष केले जातात. कुवतीप्रमाणे पितृपक्षाला जेवणाऱ्यांची संख्या जास्तच असते. कोरोनामुळे ही संख्या कमी झाली असली तरी सध्या पितृपंधरवडा जोरात आहे. त्यासाठी कारले, दोडके, भोपळा, गवार अशा भाज्यांना मागणी आहे. किरकोळ बाजारात गवार तब्बल १६० रुपये किलो, कारले ८० रुपये किलो, भोपळा ८० रुपये किलो, काकडी ८० रुपये किलो, फ्लावर १२० रुपये किलो मिळत आहे. साधारणपणे किलोमागे ३० ते ४० रुपयांनी दर वाढले आहेत.
-----------------
असे आहेत भाजीपाल्याचे दर
भाजी बाजारातील दर घराजवळील दर
गवार ७० १६०
लाल भोपळा १५ ६०
कारले २० ६०
दोडके २७ ८०
वांगे २८ ८०
भोपळा १५ ८०
काकडी १५ ८०
भेंडी २० ८०
सिमला ३० ८०
बटाटे १२ २५
फ्लाॅवर ४० १००
टोमॅटो १० ४०
पालक ८ २०
मेथी १५ ३५
शेपू १० २०
---------------------
सध्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी असल्याने दरवाढ झाली आहे. बाजारात कमी-जास्त दरवाढ चालूच असते. आडत, वाहतूक खर्च वाढला आहे. शिवाय दिवसभर बसून राहिले तरच भाज्यांची विक्री होते.
-दादा उढाणे, भाजीविक्रेते, सावेडी
-----------------
पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची जास्त गरज असते. पितृपक्षातील जेवणात भाज्यांना जास्त महत्त्व असते. भाज्या घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महागाई सगळीकडूनच वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
-शशिकला एखे, सावेडी
----------------
पितृपक्ष म्हटले की, भाज्या घ्याव्याच लागतात. या काळात लाल भोपळा, गवार, कारले आदी भाज्यांना जास्त महत्त्व असते. सध्या पाऊस अधूनमधून असला तरी शहरात भरपूर प्रमाणात भाज्या मिळत आहेत. घराजवळ महाग आणि बाजारात गेले की, पाच-दहा रुपयांनी भाज्या स्वस्त मिळतात.
-अंजली कुलकर्णी, सावेडी
--------------
मागणी वाढली
१) सध्या पितृपक्ष असल्याने भाज्यांना मागणी वाढली
२) पावसामुळे आवक कमी झालेली आहे.
३)भोपळा, गवार, भेंडीला जास्त भाव