रविवारी नगर शहरासह जिल्ह्यात एकूण १ हजार २६ कोरोना रुग्ण आढळून आले. संसर्गाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. नागरिक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रादुर्भावाचा धोका आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहेत. रविवारी सकाळपासून कोतवाली पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने शहरातील वाडिया पार्क, भिंगारवाला चौक, आयुर्वेद कॉर्नर आदी ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सायंकाळपर्यंत विनामास्कची ३५ जणांवर कारवाई करून १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. वीकेंडमध्येही दुकाने उघडी ठेवल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
...................
विक्रेत्यांना मास्कची ॲलर्जी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क वापरण्याचे प्रशासनाचे आदेश असले, तरी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे विकणारे तसेच बहुतांश दुकानदारही मास्क वापरत नसल्याचे दिसून येते. अशा विक्रेत्यांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.