आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:50+5:302021-08-18T04:26:50+5:30
अहमदनगर : राज्य शासनापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी २०० जणांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लग्नासह, साखरपुड्यांच्या कार्यक्रमांनाही ...

आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
अहमदनगर : राज्य शासनापाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी २०० जणांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लग्नासह, साखरपुड्यांच्या कार्यक्रमांनाही आता गर्दी होऊ लागली आहे. दोनेशेची मर्यादा असली तरीही जास्त संख्येने लग्नसोहळे सुरू आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे मंगल कार्यालयातही उत्साहाला उधाण आले आहे.
कोरोनामुळे शाही आणि हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नसमारंभांना ब्रेक लागला. आधी २०, ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा आता दोनशेपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या मुहूर्त नसल्याने लग्नसोहळे तीन महिने लांबणीवर पडले आहेत. मात्र कधी नव्हे ते निर्बंध शिथिल झाल्याने मुहूर्त न पाहता अनेकांचा कल लग्नसमारंभ उरकून घेण्यावरच आहे. ज्यांना मुहूर्तात लग्न करायचे आहेत, ते सध्या साखरपुड्यांचे कार्यक्रम दणक्यात करीत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र अद्यापही दैनंदिन रुग्णसंख्या ७०० ते ८०० च्या जवळपास आहे. डेल्टाच्या भीतीचे सावट आहे. मात्र बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत असून लग्नसोहळ्यांची संख्याही वाढली आहे.
-------------
लग्नसमारंभासाठी या आहेत अटी
मंगल कार्यालय: मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी तेथे वऱ्हाडी मंडळी जाण्यापूर्वी पूर्ण परिसर सॉनिटायझिंग करून घेणे, प्रत्येकाने मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.
लॉन : मंगल कार्यालये आणि लॉन परिसरासाठी सारखेच नियम लागू करण्यात आले आहेत. वऱ्हाड परराज्यातून येणार असेल तर त्यांची कोरोना चाचणी करून घेणे, तसेच वऱ्हाडी मंडळींनी कोरोना लसीकरण केले की नाही, हे तपासणे इतर आवश्यक ती माहिती कळविणे.
-------------
मंगल कार्यालयात उत्साहाला उधाण
लग्न व इतर समारंभांना २०० लोकांची परवानगी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगल कार्यालय बुकिंग करण्यासाठी आता चौकशी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लग्नांपेक्षा साखरपुड्याचे कार्यक्रम अधिक आहेत.
- सौरभ शिंदे, सारसनगर
----
कोरोना नियमावलीचे पालन केले जाते. वऱ्हाडी मंडळीसाठी आम्ही सॉनिटायझरची सोय उपलब्ध करून देतो. सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. याशिवाय अक्षतासोबत वधुवरांचे नातेवाईक मास्कही उपलब्ध करून देतात. सोशल डिस्टन्सिंगसह आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोज, मास्क देतो. -दीनानाथ जाधव, नगर-मनमाड रोड
-------------
मुहूर्त तीन महिन्यांनी, गौण मुहूर्त भरपूर
लग्नाचे मुहूर्त जवळपास संपले असून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे तीन महिने आता मुहूर्त नसून नोव्हेंबरमध्ये २०, २१, २९ आणि ३० असे विवाह मुहूर्त आहेत. मात्र गौण विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने या मुहूर्तावर लग्न करण्यावर मोठा भर असल्याचे दिसते.
---
रोजी सुरू झाल्याने बॅंडवाले जोरात
कोरोनामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. भीतीपोटी कोणीही वाजंत्री लावत नव्हते. परंतु शासनाने नियम शिथिल केल्याने आता लग्नासाठी वाजंत्री, बॅंड लावले जात आहेत. ही चांगली गोष्ट असून लग्नावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांचे चक्र पुन्हा गतिशील होईल.
- गौरव राऊत, बॅंड कंपनी
-------------
लग्नाचे मुहूर्त संपल्यानंतर शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. आजघडीला लग्नासाठी शुभमुहूर्त नाहीत. मात्र तीन महिन्यांनी तिसरी लाट आली तर मुहूर्त असून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे चांगला दिवस पाहून अनेक जण लग्नाच्या तारखा निश्चित करीत आहेत.
- किशोर जोशी, जिल्हा पुरोहित संघटना
-------------
डमी क्रमांक -१०५२