निंबळक : लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात निंबळकला पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत एमआयडीसी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पाणीसाठा वाढवून देण्याबाबतचे आदेश तटकरे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.
निंबळक (ता. नगर ) येथे २००५ च्या जनगणनेनुसार पाणी मिळत होते. मात्र आता येथील लोकसंख्या वीस हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे नागरिकांना पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळत होते. पाणीसाठा वाढवून मिळण्याबाबत सरपंच प्रियंका लामखडे यांनी आ. नीलेश लंके यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. लंके यांनी राज्यमंत्री तटकरे यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार दि.२५ रोजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. त्यासाठी आ. नीलेश लंके, अजय लामखडे, निंबळकचे शिष्टमंडळ, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. निंबळक गावासाठी १२ लाख लिटर किंवा गावच्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणी कोटा मिळणेबाबत सकारात्मक चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे निंबळकचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी बाळासाहेब कोतकर, माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत आप्पा शिंदे, सोमनाथ खांदवे, बाबासाहेब पगारे, भाऊसाहेब शिंदे, भाऊराव गायकवाड, रावसाहेब आण्णा कोतकर, अजय गोडसे व ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे उपस्थित होते.