शिवाजी पवार
श्रीरामपूर : महावितरण कंपनीच्या श्रीरामपूर विभागीय कार्यालयाने विशेष पथकाद्वारे वीजचोरीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. वीज कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार मीटरमध्ये छेडछाड करून अथवा विजेच्या जोडणीचा उद्देश बदलून वीज वापरणाऱ्या १०६ ग्राहकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना तब्बल ३९ लाख रुपये दंड ठोठावत वसुली करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीच्या येथील विभागीय कार्यालयाअंतर्गत श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहुरी व राहाता तालुक्याचा काही भाग येतो. या सर्व ठिकाणी एप्रिल २०२१ पासून वीजचोरीचे प्रकार रोखण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी लोकमतला दिली. कारवाई अद्यापही सुरू ठेवण्यात आली आहे.
------------
कायदा काय सांगतो
वीज कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार वीजजोडणीचा उद्देश बदलून दुसऱ्याच कारणांसाठी तिचा वापर होत असेल तर तो गुन्हा ठरतो. घरगुुती वापराकरिता जोडणी घेऊन जर व्यावसायिक वापर होत असेल तर त्यामुळे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान होते. कारण महावितरण कंपनीने विजेच्या वापरानुसार दर निश्चिती केलेली आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक असे ग्राहक त्याकरिता निश्चित करण्यात आलेले आहेत.
----------
शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी कारवाई
शेजाऱ्याकडून वीज घेऊन तिचा वापर करणे हादेखील गुन्हा ठरतो. एकाच मीटरवर अनधिकृत वापर केल्यास त्यावरही कारवाई केली जाते.
-----------
महावितरणची तीन महिन्यांतील कारवाई
एप्रिल ते जुलै २०२१
१०६ वीजचोरीचे गुन्हे : दंड ३९ लाख रुपये
श्रीरामपूर शहर : ८१ चोऱ्या
-----------
चोरी कळवा व पैैसे कमवा
वीजचोरीबाबतची माहिती महावितरण कंपनीला दिली आणि ती खरी ठरली तर कमाईची संधी प्रत्येक नागरिकाला मिळते. संबंधित ग्राहकाकडून होणाऱ्या दंडवसुलीतील १० टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून माहिती देणाऱ्याला मिळते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन चालते. माहिती देणाऱ्याचे नावही त्यामुळे गुप्त राहते.
---------
मीटरमध्ये छेडछाड करण्याच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता कामा नये. कारवाई झाल्यास त्या ग्राहकाची मानहानी होते. त्यामुळे प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा व महावितरणला सहकार्य करावे.
- अनिल थोरात, कार्यकारी अभियंता, श्रीरामपूर विभागीय कार्यालय
---------