मनसे-भाजप युतीत प्ररप्रांतीयांची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:31+5:302021-07-24T04:14:31+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेत बदल केल्यास भाजप मनसेसोबत युती ...

मनसे-भाजप युतीत प्ररप्रांतीयांची आडकाठी
अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेत बदल केल्यास भाजप मनसेसोबत युती करण्याचा विचार करील, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मनसेशी युती करण्याबाबत पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे. परंतु, जोपर्यंत परप्रांतीयांबाबत मनसे भूमिका बदलणार नाही, तोपर्यंत मनसे भाजप सोबत येण्याचा विचार करणार नाही. सध्या तरी मनसेशी युती करण्याचा भाजपाचा विचार नाही. ज्या गावाला जायचे नाही, त्या गावचा रस्ता विचारायचा कशाला. परंतु, ते जर हो म्हणाले, तर मात्र त्यांच्याकडे कसे जायचे बसने की ट्रेनने ते योग्य वेळी ठरवू. भाजपची राज्यात अकरा पदाधिकाऱ्यांची समिती आहे. या समितीत युतीचा निर्णय होईल, असे पाटील म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कोरोना, मराठा व ओबीसी आरक्षण आणि पूर परिस्थितीबाबत सरकार गंभीर नाही. दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी कोल्हापूरला पूर आला होता. तेंव्हा देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वत: पूर परिस्थितीची पाहणी करून मदत पोहोचविली. असे असताना त्यावेळी जयंत पाटील यांनी कुठे गेले पाटील, असा सवाल केला होता. आता त्यांना मी विचारतो की पूरपरिस्थितीत जयंत पाटील कुठे आहेत, असे पाटील म्हणाले.
...
पूर परिस्थितीत मुख्यमंत्री घरातच
राज्यात पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी पूर आलेला आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री ऑनलाइन बैठका घेत असून, त्यांचे मंत्रीही घरातच बसून आहेत, अशी घणाघाती टीकाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.