तनपुरे म्हणाले, मुळा धरण उद्भव असलेल्या वांबोरी पाईप चारीच्या प्रस्तावित टप्पा दोनमध्ये पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील १२ गावांमधील ३२ तलावांमध्ये धरणातून शंभर दशलक्ष घनफूट पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. त्याद्वारे एक हजार १२२ हेक्टर क्षेत्राला अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या कामासाठी ३१७ कोटी ६ लाखांच्या खर्चासाठी सातव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव १६ ऑक्टोबर २०२० रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यानुसार, आगामी तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वांबोरी चारीसाठी खडांबे येथे जलसंपदा खात्याने संपादित केलेल्या जमिनीपैकी २४.९० हेक्टर क्षेत्र विनावापर शिल्लक आहे. त्याची जलसंपदा खात्यास आवश्यकता नाही. त्या जमिनी शेतकरी कसत आहेत.
मुळा धरणातून भागडा चारीसाठी ६० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. भागडा चारीद्वारे राहुरी तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील नऊ गावांमधील ५९ तलावांत पाणी सोडण्याचे नियोजित आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी निदर्शनास आणून दिले. या बैठकीसाठी गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे उपस्थित होते.