श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात २३ हजार ४३० एमसीएफटी ७९ टक्के पाणीसाठा झाला असून येडगाव धरणातून ओव्हरफ्लोचे १ हजार ३०० क्युसेकने कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले आहे. कुकडी प्रकल्पातील पाऊस थंडावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात ६ टक्के अधिक पाणीसाठा आहे.
येडगाव धरणात १ हजार ६६६ एमसीएफटी ८४ टक्के पाणीसाठा आहे. धरणातून १ हजार ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले. या आवर्तनातून विसापूर तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. माणिकडोह धरणात ५ हजार ८९८ एमसीएफटी ५८ टक्के भरले आहे. डिंभे, वडज ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
पिंपळगाव जोगे धरणात २ हजार १९६ एमसीएफटी म्हणजे ५६ टक्के पाणीसाठा आहे. घोड धरणात २ हजार ८३२ एमसीएफटी ५८ टक्के पाणीसाठा झाला आहे. डिंभे, वडज धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी बंद झाल्याने घोडचा पाणीसाठा स्थिर आहे. विसापूर तलावात ९ टक्के पाणीसाठा असून सीना धरणात ७९ टक्के, तर खैरी तलाव १०० टक्के भरला आहे.