श्रीगोंदा : केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. आता महाआघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.
पाचपुते यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती केल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे पूर्ण अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत. आता राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करणे गरजेचे होते. मात्र आघाडी सरकार ५० टक्क्यांच्या मुद्यावर अडून बसले आहे. आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही असे दिसते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यावेळी पन्नास टक्क्यांची मर्यादा होतीच. मग आता महाविकास आघाडी सरकारचा वेळकाढूपणा कशासाठी, असा सवाल पाचपुते यांनी केला आहे.