केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात मागील आठवड्यात बिबट्याने धुमाकूळ घालत तीन मेंढ्या व दोन कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्या पार्श्वभूमीवर जेऊर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच राजश्री मगर व उपसरपंच श्रीतेश पवार यांनी वन विभागाकडे केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन देऊन जेऊर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात चाफेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात भिवा घुले यांच्या पालावर दोन बिबट्याने हल्ला करून तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार केला होता, तर शेटे वस्ती येथील नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली होती. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक, शेतकरी व गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.