अहमदनगर : एरव्ही फक्त शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्याच चेहऱ्यावर दिसणारे मास्क कोरोनाकाळात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसू लागले. कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक जण मास्क वापरू लागला. मात्र, मास्कचा सततचा वापरही धोकादायक ठरू शकतो. चेहऱ्यावरील सततचा मास्क हा बुरशीजन्य आजारास निमंत्रण ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही एकटे असाल किंवा घरात असाल, तर मास्क न वापरलेलाच बरा, असा सल्ला आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देऊ लागले आहेत.
कोरोनाकाळात तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. तोंडावर मास्क नसेल, तर सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी मास्क गरजेचाच आहे. त्यामुळे प्रत्येक जण मास्कचा वापर करताना दिसत आहे. कोरोनाचा नव्हे, तर इतरही संसर्गजन्य आजारांपासून मास्कमुळे बचाव होऊ शकतो. मात्र, मास्कचा अति वापरही धोकादायक ठरू शकतो, असे आता वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
सतत तोंडावर मास्क असल्यामुळे त्या जागेवर घाम येतो. घामामुळे बुरशीजन्य आजार उद्भवू शकतात, तसेच इतर श्वसनाचे आजारही होऊ शकतात. सतत मास्क वापरल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्वचेला खाज सुटण्याचे प्रकारही वाढत आहेत. मास्कच्या जागेवरील त्वचेचा रंग बदलल्याचे प्रकारही समोर येत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
...........................
मास्क रोज स्वछ धुऊनच वापरणे गरजेचे, सततचा मास्क बुरशीजन्य आजारास निमंत्रण, घामामुळे बुरशीजन्य आजार, तसेच बाकीचे श्वसन आजारही होऊ शकतात, सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये मास्क अत्यावश्यक आहे जेथून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, सतत मास्क वापर (n95) मुळे hypoxia रक्तातील ऑक्सिजन कमी होणे, चेहऱ्यावरील त्वचेचा रंग बदलणे, असेही होत आहे, घरी ऑफिस, प्रायव्हेट रूम जेथे बाकी आणखी कोणाचाही संपर्क येणार नाही, अशा ठिकाणी मास्क न वापरणे केव्हाही चांगले.
.............................
मास्क आवश्यकच; पण असे करा रक्षण!
कोरोनाकाळात मास्क वापरणे आवश्यकच आहे; पण आपण वापरत असलेला मास्क स्वच्छ असावा. शक्यतो डिस्पोजेबल मास्क वापरावा. एन-९५ मास्क किंवा थ्री लेअर मास्क वापरणे उत्तम. तुम्ही सार्वजिनक ठिकाणी काम करीत असाल, तर मास्क वापरणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही वारंवार चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. हात साबणाने स्वच्छ धुवावेत. एकटे किंवा खासगी रूममध्ये असाल, तर मास्क न वापरलेलेच योग्य, असे डॉक्टर सांगतात.
.........................
सॅनिटायझरपेक्षा साबण चांगला
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचा वापर केलेला असतो. त्यामुळे सॅनिटायझरचा सतत होणारा वापर त्वचेवर परिणामकारक ठरू शकतो. त्वचेला खाज सुटणे, त्वचेला लालसर रंग चढणे, छोटे- छोटे पुरळ उठणे, असे प्रकार उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी साबणाने हात धुवावेत.
..............
त्वचाविकाराचे रुग्ण वाढू लागले
मास्क, सॅनिटायझरच्या अतिवापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे त्वचाविकाराचे रुग्ण काही प्रमाणात वाढू लागले आहेत. मास्क, सॅनिटायझर हे प्राथमिक सुरक्षेचे उपाय आहेत; परंतु मास्क, सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक आहे. त्यातून इतर आजार बळावू शकतात.
-डॉ. संजय सोनवणे, घोडेगाव