करुणा शर्मा यांच्याबाबत कटकारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:33+5:302021-09-07T04:26:33+5:30
अहमदनगर : परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत रविवारी जी घटना घडली ती एक कटकारस्थान आहे. राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कुणावर ...

करुणा शर्मा यांच्याबाबत कटकारस्थान
अहमदनगर : परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत रविवारी जी घटना घडली ती एक कटकारस्थान आहे. राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कुणावर अन्याय करण्याची भूमिका असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रसारमाध्यमातून घटनेच्या वेळी जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते, असा आरोप भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, भारतात सर्वांना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडणे हा सुद्धा एक कटच असल्याचे व्हायरल व्हिडिओवरून दिसून येते आहे.
---------
जावेद अख्तर यांचा केला निषेध
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे वक्तव्य केले आहे. याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, जावेद अख्तरसारखी माणसे भारतात राहून इतर देशांबद्दल बोलत असतील तर त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना घालवून येथे लोकशाही आणलेली आहे. त्यामुळे येथे कुणी इतर देशांचे दाखले देऊ नयेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांसंबंधी न बोललेलेच बरे.
----------
अनिल देशमुखांना आता लाठ्याची भीती
कोरोनाच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. केंद्रीय मंत्र्याला तात्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत. केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही ते सापडत नाहीत, हे पटत नाही. वकील, अधिकाऱ्याला अटक झाली आणि आरोपी फरार आहे, असे प्रथमच घडत असावे. त्यामुळे त्यांनी स्वत: हजर झाले पाहिजे. ते कुठे आहेत, हे पोलिसांना माहिती असेल, असा दावाही शिंदे यांनी केला.