बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:00+5:302021-08-26T04:23:00+5:30
संगमनेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले निर्बंध ...

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर
संगमनेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले निर्बंध यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आगारातच उभ्या होत्या. अनलॉकनंतर आता बसेस धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकात खाद्यपदार्थ, पाणी बॉटल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दोन पैसे मिळत असून त्यांच्या संसाराची गाडीही हळूहळू पुन्हा रूळावर येते आहे.
कोरोनाचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला. याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळदेखील अपवाद नव्हते. कोरोनाकाळात महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. नाशिक-पुणे दोन महानगरांना जोडणारा रस्ता संगमनेर तालुक्यातून जात असल्याने संगमनेर स्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असायची. कोरोना येण्याआधी संगमनेर आगाराचे महिन्याचे उत्पन्न साधारण दीड कोटीपर्यंत होते. येथील बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करून अनेक तरुण उदरनिर्वाह करायचे. मात्र, कोरोनामुळे बसेस बंद झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले. यापैकी अनेक जण हातावर पोट असलेले. त्यामुळे ‘हातावर कमवायचे आणि हातावर खायचे अशीच त्यांची परिस्थिती. कोरोनाकाळात त्या सर्वांचे मोठे हाल झाले. यातील काहींनी शेतीची कामे केली, काही मजुरी जायचे. संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे कष्ट करून कसे मिळतील, यासाठी मिळेल ती कष्टाची कामे केल्याचे बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी सांगितले.
संगमनेर आगारात एकूण ५३ बसेस असून, त्यात दोन शिवशाही तर दोन सेमी लक्झरी बसेस आहेत. बसस्थानकातून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच काही ग्रामीण फेऱ्या अशा एकूण ११२ फेऱ्या दररोज होतात. राज्यातील अनेक आगारांच्या तसेच परराज्यातील परिवहन मंडळाच्या बसेस संगमनेर स्थानकात येतात. कोरोनामुळे महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके आता पुन्हा गतिमान होऊ लागली आहेत. महामंडळाच्या बससेवेला प्रवासाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे स्थानकात खाद्यपदार्थांची विक्री होते आहे; परंतु पूर्वीसारखा धंदा आता होत नाही. पहिल्यासारख्याच सर्वच बसेस लवकर सुरू झाल्यास आमच्यासाठीदेखील चांगले राहील. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर धंदा चांगला होईल. असे बसस्थानकात खाद्यपदार्थ, पाणी बॉटलची विक्री करणाऱ्यांनी सांगितले.
----------------
इतरही आगाराच्या बसेस स्थानकात
संगमनेर बसस्थानकातून औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, चाळीसगाव, बारामती, जालना, गोंदवले, अहमदनगर, नाशिक या लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच काही ग्रामीण फेऱ्या अशा एकूण ११२ फेऱ्या दररोज होतात. इतरही आगाराच्या बसेस संगमनेर बसस्थानकात येतात.
-------------
गेल्या दहा वर्षांपासून संगमनेर बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करतो. लॉकडाऊनमध्ये बसेस बंद असल्याने मोठे हाल झाले. आर्थिक संकट होते. खर्च तर सुरूच होता. मिळेल ते कष्टाचे काम केले. आता बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांची विक्री करून दोन पैसे मिळतात.
- महेश जाधव, खाद्यपदार्थ विक्रेता, संगमनेर बसस्थानक
------------
काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. कोरोनाकाळात बसेस बंद असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे कामही बंद होते. हाताला काम नसल्याने पर्यायी कामे शोधली. मिळेल ती कष्टाची कामे केली. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून दररोजचा होणारा खर्च कसा तरी भागवत होतो.
- गणेश सातपुते, खाद्यपदार्थ विक्रेता, संगमनेर बसस्थानक
---------------
फोटो नेम : २५संगमनेर बसस्थानक
ओळ : संगमनेर बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करणारे तरुण.