आयपीएलमध्ये रविवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाबरोबरच मुंबई इंडियन्सचं यंदाच्या स्पर्धेतील आव्हान औपचारिकपणे संपुष्टात आलं आहे. यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोटात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत.
बंगळुरूविरुद्धच्या लढतीनंतर हार्दिक पांड्या याने मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावरून अनफॉलो केले. मात्र काही वेळातच हार्दिकने मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा फॉलो केल्याचे समोर आले. यादरम्यान, हार्दिकची गर्लफ्रेंड महिका शर्मा हिनेही मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रायपूर येथे झालेल्या लढतीवेळी हार्दिक पांड्या हा स्टेडियममध्येही दिसला नव्हता. पाठदुखीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या बंगळुरूच्या लढतीसाठी रायपूर येथे पोहोचला होता. मात्र तंदुरुस्त नसल्याने तो या सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच सामन्यादरम्यान, तो मुंबई इंडियन्सच्या संघासोबतही दिसला नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार याने संघाचं नेतृत्व केलं होते. हार्दिक पांड्या आणि मुंबई इंजियन्सच्या संघव्यवस्थापनामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्यात ताळमेळ जुळत नाही आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील नातं तुटण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून याबाबत कुठंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.
दरम्यान, १० मे रोजी रात्री हार्दिक पांड्या याने सोशल मीडियावरून मुंबई इंडियन्सशी संबंधित कंटेट हटवल्याचे तसेच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हार्दिकची गर्लफ्रेंड महिका हिनेही मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याचा दावा करण्यात आला. मात्र रात्री हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सला फॉलो करत असल्याचे समोर आले. मात्र या सर्व घडामोडींमधून हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सपासून वेगळा होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
आधी मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेल्या हार्दिक पांड्याला २०२२ च्या लिलावात गुजरात टायटन्सने खरेदी केले होते. तसेच हार्दिकने गुजरातचं नेतृत्व करताना संघाला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच २०२३ मध्येही हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते. मात्र तो गेल्या तीन हंगामात म्हणावा तसा प्रभाव पाडू शकलेला नाही.