अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई सूडबुद्धीने आणि चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या अटकेचा भाजपने निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी निदर्शने केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, महेश नामदे, बाळासाहेब गायकवाड, किशोर बोरा, तुषार पोटे, वसंत राठोड, अजय चितळे, महेश तवले, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, विशाल खैरे, अमित गटणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी केली आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला बेकायदेशीर अटक करून दिलेली वागणूक ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात घडत आहे, ही घटना दुर्दैवी आहे. जर केंद्रीय मंत्र्याला अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत; परंतु शासन त्याकडे डोळेझाक करून खरे बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे. हे दडपशाहीचे राजकारण आहे. त्यास भारतीय जनता पार्टी सडेतोड उत्तर देईल.
याप्रसंगी सुनील रामदासी यांनी राडा संस्कृती ही भाजपाची नसून केंद्रीय मंत्र्यांना ज्या पद्धतीने अटक केली जाते, ती चुकीची असल्याचे सांगितले आहे. यावेळी सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, प्रशांत मुथा, सुजित खरमाळे, उमेश साठे, ऋग्वेद गंधे, लक्ष्मीकांत तिवारी, आशिष आणेचा, प्रणव सरनाईक आदी उपस्थित होते.
--
फोटो -२६ भाजप निषेध
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे झालेल्या अटकेचा भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध केला.